मुंबई : लता गुठे लिखित 'जगण्याच्या आरपार' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ सहित्यिका डॉ. विजया वाड आणि कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गुठे यांच्या 'मोहक युरोप' या प्रवासवर्णनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले.
विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याशिवाय याप्रसंगी लता गुठे यांच्या 'भरारी प्रकाशन'च्या पन्नासाव्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळाही साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून रविराज गंधे, गौरी कुलकर्णी व आमदार पराग अळवणी उपस्थित होते.
‘प्रामाणिक प्रयत्न हेच गुठे यांच्या यशाचे गमक असून, त्यांच्या कविता वेगळ्या नजरेने टिपलेल्या असल्याने त्या वास्तव मांडतात,’ असे उद्गार या वेळी आमदार आळवणी यांनी काढले. तर कवी अरूण म्हात्रे यांनी, ‘कवी म्हणजे कवीच असतो; तो दुसरं काही करत नाही, पण लता गुठे यांनी प्रकाशन व्यवसायात दमदार पाऊल रोवले आहे. मराठीला आपण अभिजात भाषा म्हणतो पण प्रसिद्ध कवींच्या पुस्तकांच्या हजार प्रतीही संपत नाहीत, हे मराठीचे दुर्दैव आहे,’ अशी खंत व्यक्त करून, प्रकाशनाबरोबर लता गुठे या कविताही जपतात याचे आश्चर्य व्यक्त केले. कवीच चांगला निवेदक, लेखक, पत्रकार होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.
अध्यक्षस्थानी असलेल्या जेष्ठ साहित्यिका विजया वाड यांनी, ‘लता गुठे यांना मोहक नजरेतून बघण्याचं सामर्थ्य असल्याने त्यांचा युरोप मोहक झालाय. त्यांनी त्यांच्या ‘जगण्याच्या आरपार’ कवितासंग्रहात जगण्याचं नाटक चांगलंच रंगवले आहे,’ असे गौरवोद्गार काढले.
साहित्यिका माधवी कुंटे यांनी लता गुठे यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी भरारी प्रकाशनच्या वतीने उपस्थित साहित्यिक सदानंद डबीर, सुरेश खरे, एकनाथ आव्हाड, रविंद्र आवटी, महेश घाटपांडे, नमिता कीर, प्रदिप भिडे प्रा.पंढरीनाथ रेडकर, सूर्यकांत मालुसरे, अॅड. यशवंत कदम, सदानंद राणे, संगीता अरबुने, भगवान निळे, ज्योती कपिले, शिवाजी गावडे, इकबाल मुकादम, पल्लवी बनसोडे, नेहा वाघ, वृषाली शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन मृण्मयी भजक यांनी केले.